राज्यात येणार दुधाचा महापूर!

मुंबई - शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाचा वाढता तुटवडा लक्षात घेता, राज्यात पुन्हा धवलक्रांती करण्याच्या हेतूने दुग्धविकास विभागाने कृतिबद्ध आराखडा तयार केला आहे. विविध उपक्रम आणि योजनेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात दुधाचा महापूर निर्माण होईल, असे संकेत दुग्धविकासमंत्री नितीन राऊत यांनी आज दिले.

आज जागतिक दूधदिनाचे औचित्य साधून राऊत यांनी पुढील पाच वर्षांत दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा मांडली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दुधाच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात सध्या दुधाचा दुष्काळ जाणवत असल्याचे चित्र आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षमीकरणाची कास धरत पुढील पाच वर्षांत राज्यातील दुधाचे उत्पादन दुप्पट करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. यासाठी दुग्धविकास विभागाने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्सची निर्मिती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या गावागावांत असलेल्या सहकारी दूध संस्थांचे चित्र आगामी काळात बदलणार असल्याचे सूचित करताना "नवीन पिढीचा सहकार' या संकल्पनेखाली "एक गाव एक दूध संस्था' हा उपक्रम सरकार राबविणार असल्याचे श्री. राऊत यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यातील दापचरी येथे दुग्धविकास विभागाची सहा हजार एक जमीन असून या ठिकाणी राज्यातला पहिला डेअरी सेझ उभारण्याचा मानस सरकारचा आहे, तर मुंबईतल्या आरे या सरकारी दुग्ध वसाहतीत डेअरी टूरिझम पार्कची उभारणीदेखील करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे श्री. राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले.

सध्या मुंबईतल्या दुग्धशाळेत अडीच लाख लिटर दुधाची प्रक्रिया करण्याची क्षमता आहे; मात्र सध्या केवळ 70 हजार लिटर दूध राज्यभरातून उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली. दुधाच्या क्षेत्रात विविध खाजगी कंपन्यांची झालेली वाढ लक्षात घेता या कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी दुग्ध व्यवसायालादेखील कात टाकण्याची गरज आहे, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

एक गाव-एक दूधसंस्था कार्यक्रम
उत्पादनवाढीसाठी टास्क फोर्स
दापचरी येथे डेअरी सेझ
डेअरी पर्यटन पार्क

original at : http://www.esakal.com/esakal/20100602/5489047817078431124.htm

No comments:

Post a Comment

Reach us at facebook